जो स्वत:त बदल घडवून आणण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे;अशा प्रत्येकासाठी...


Tuesday, 3 November 2020

बालपण मनस्वी जपायला हवं

जन्माला आल्यापासून मूल सामाजिक चौकटीत नेमकं कसं बसेल आणि त्याचं मनाजोगतं करिअर लवकर कसं घडेल, यासाठीच पालकांची धडपड असते. हल्ली तर अर्भक गर्भात असल्यापासून त्यांना काय व्हायला हवं आणि त्यासाठी काय मिळवायला हवं, याचाच आजचा पालकवर्ग विचार करताना दिसतो. हल्ली एकच मूल असल्यामुळे सारं लक्षच मुलाच्या एकूण जडणघडणीवर केंद्रीत असतं. त्यामुळे त्याला काय हवंय, काय आवडतं, काय जमतं हे जाणून घेण्यापेक्षा आई-बाबांना अपेक्षित असलेलंच मुलाच्या बाबतीत अधिक महत्त्वाचं ठरतं. मग ते मुलाच्या मनाविरूद्ध का असेना.

संपूर्ण अंक वाचण्यासाठी वरील चित्रावर टिचकी मारा.
(संपूर्ण अंक वाचण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)
स्वाभाविकच बऱ्याच घरांतून मुलांच्या मनाचा सहसा विचार होताना दिसत नसल्यानं त्यांची नैसर्गिक वाढही बंदिस्त होत जाते. ते पालकांच्या अंगानं आणि कलानं वाढत असतं. कारण पालकांना मुलांच्या सर्वांगीण वाढीपेक्षा स्वत:चे प्रतिष्ठेचे मापदंड अधिक महत्त्वाचे वाटत असतात. त्यासाठी गरज नसतानाही आणि खोट्या अहंकारासाठी मुलांच्या आयुष्यात नको तितकं लक्ष घालतात. याचा परिणाम असा होतो की, मुलंही पालकांशी खोटं वागू लागतात, जगू लागतात.

निसर्गत:च जे मिळालेलं असतं, ते पुढच्या आयुष्यात त्याला गवसतच नाही. कुणाचं तरी अनुकरण करत किंवा इतरांची उदाहरणं ऐकत ते स्वत:चं स्वत्व गमावून बसताना दिसतं. याची पुसटशी जाणीवही पालकांना होताना दिसत नाही. एक विशिष्ट लक्ष्य ठेवून मुलाला वाढवलं जातं. कारण मुलाची वाढ आणि विकास हा प्रवास सहज आणि सुखकर होण्यासाठी पालक म्हणून गरजेची असलेली शास्त्रीय माहिती आपल्याकडे जाणून अथवा समजून घेतली जात नाही.

लहान मुलाला नेहमीच शिकवावं लागतं. ते शिकवल्याशिवाय शिकत नाही असा एक (गैर)समज असल्यामुळे हल्ली अगदी तीन-चार वर्षांच्या बालकाला मारूनमुटकून घरात आणि शिशुवर्गात शिकवायला सुरवात केली जाते. एवढंच नव्हे तर शिकवणी ठेवल्याशिवाय अधिक गुण मिळणार नाहीत आणि अपेक्षित गुण मिळाले नाही तर ते या स्पर्धेच्या जगात मागे राहील, या अनाठायी भीतीपोटी आजचा पालकवर्ग ताण घेऊन जगत आहे. केवळ भविष्याच्या काळजीपोटी त्याचं बालपण आपण हिरावून घेतलं आहे.

खरं तर मूल या वयात निरीक्षण, जिज्ञासा आणि कल्पनाशक्तीच्या आधारे खूप काही शिकत असतं. True sign of knowledge is not intelligence but imagination, मुलांची कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती हीच ज्ञानाची खरी खूण असते, असं म्हटलं गेलं आहे. याच वयातल्या कल्पनाशक्तीचे आपण अभ्यासाच्या ओझ्याखाली पंख छाटून टाकत असतो. संपूर्ण आयुष्याला आकार देणारा बालपणाचा रम्य काळ आपण भविष्याच्या चिंतेमुळे गुदमरून टाकत असतो.

खेळातून मूल स्वाभाविक शिकत असतं. खेळातूनच त्याच्या मेंदूची वाढ अधिक परिपक्व होत असते. आयुष्यभरासाठी लागणारं आकलन आणि निरीक्षण ते खेळातूनच गिरवत असतं. या बालवयातच स्वत: अनुभव घेत ते अव्याहतपणे अनेक बऱ्या-वाईट गोष्टी आत्मसात करत असतं. म्हणूनच घडविण्यापेक्षा घडणं आणि शिकवण्यापेक्षा शिकणंअधिक महत्त्वाचं मानलं गेलं आहे. खरं तर सहज शिकणं हे अनुकरण आणि अनुभवातून होत असतं. अशा वेळी वैयक्तिक वा सामूहिक पातळीवर शिकवण्याच्या नावाखाली अतिरेकी शिस्त, शिक्षा, मार, भीती, अपमान, अवहेलना सहन करत ते वाढत असतं.

विशेष म्हणजे मूल म्हणजे मातीचा गोळा आहे आणि आपण या मातीच्या गोळ्याला हवातसा आकार देऊ शकतो किंवा कोरी पाटी समजून घडवू शकतो. ही संकल्पना नव्या मेंदूविषयक संशोधनातून अशास्त्रीय असल्याचं सिद्ध झालं आहे.

म्हणूनच मुलांच्या बालपणाच्या काळात प्रचंड सहनशक्तीसह स्वत:ला बदलवत, घडवत जाण्याची प्रक्रिया पालकांमध्ये वाढीस लागेल तेव्हा पाल्याच्या बाबतीतलं पाहिलेलं स्वप्न साकार होईल.

प्रा. विजय जामसंडेकर

No comments:

Post a Comment